पानचिंचोली, ता. 08 (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिर अभियान” अंतर्गत पानचिंचोली (ता. निलंगा) येथे 10 एप्रिल 2026 रोजी भव्य समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या पार्श्वभूमीवर हनुमान मंदिर, पानचिंचोली येथे तयारीची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
ही बैठक उपविभागीय अधिकारी शरद झाडके आणि तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी निळकंठ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला महसूल मंडळातील अमर सुरवसे, गणेश पानखडे, किशोर चव्हाण, दिगंबर वाघे, विजया सोमवंशी यांसह ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक, कोतवाल, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी तसेच CSC व आधार केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरामध्ये नागरिकांना विविध महसुली व शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. यामध्ये 7/12 व 8अ दुरुस्ती, उत्पन्न, रहिवासी व जातीचे दाखले, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठीही विशेष व्यवस्था केली जाणार आहे.
तसेच शिबिराच्या व्यापक प्रसिद्धीसाठी ग्रामपातळीवर दवंडी, सूचना फलक आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पानचिंचोली व परिसरातील नागरिकांनी या समाधान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.








