वाडाः जिल्ह्यात सुरू असलेल्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे सहकार्य घेतले जाईल. असे पालघर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सांगितले. जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाई संदर्भात श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाशी ते स्वतंत्र्यपणे बोलत होते.
संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाई मनोज रानडे यांच्या निदर्शनास आणून दिली. शासनाच्या पाणीटंचाई आराखड्यात राहून गेलेले गाव पाडे संघटनेने निदर्शनास आणून दिल्याबद्दल रानडे यांनी श्रमजीवी संघटनेचे आभार मानले.
श्रमजीवी संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार पालघर जिल्ह्यातील वाडा
(५८), तलासरी (२०), मोखाडा (६२), डहाणू (१४), वसई (४१), जव्हार (१३) आणि विक्रमगड (३४) अशा मोठ्या प्रमाणावर गाव-पाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, जिथे शक्य आहे तिथे बोअरवेल उपलब्ध करून द्याव्यात तसेच पाणीटंचाई निवारणासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी करण्यात आली.
श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाने ३१ मे पर्यंत आधार कार्ड नसलेल्या व्यक्तींना आधारकार्ड मिळवून देण्याबाबत करावयाच्या कृती कार्यक्रमाची चर्चा केली. तसेच वन अधिकार प्रलंबित दाव्या बाबत अजूनही ग्रामपंचायत स्तरावर ८८३१ व जिल्हा स्तरावर ३३४५ इतके वनदावे प्रलंबित
असल्याचे वास्तव मांडले यावर रानडे यांनी तात्काळ कार्यवाही करण्याबाबत ग्वाही दिली. दरम्यान, पालघर जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी संघटनेच्या संघटक सचिव सीता घाटाळ, जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, प्रभारी जिल्हा सचिव कैलास तुंबडा, जिल्हा महिला प्रमुख रेखा पन्हाड आणि जिल्हा उपाध्यक्ष अंकुश वड, मोखाडा तालुका निरीक्षक रघु चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण पडवळे, विक्रमगड तालुका अध्यक्ष मंगेश काळे, तलासरी तालुका अध्यक्ष सुरक्षा रायात, वसई शहर तालुका अध्यक्ष नारायण विघ्ने, डहाणू तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र उंबरकर, वाडा तालुका सचिव सुरज दळवी, पालघर तालुका कार्यालयीन सचिव शंकर वरखंडे उपस्थित होते.










