बोरद (प्रतिनिधी) : बोरद येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून या निमित्ताने आयोजित विराट हिंदू संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकल हिंदू समाज व उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
हनुमान जयंतीनिमित्त सकाळपासूनच हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भजन, कीर्तन व पूजा-अर्चा यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. ग्रामस्थांच्या वतीने मंदिरात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारी सुमारे चार वाजता राम मंदिरापासून श्रीरामाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रेत गावातील युवक, महिला व बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ढोल-ताशांचा गजर, धार्मिक घोषणाबाजी आणि पारंपरिक वेशभूषेमुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीत आकर्षक सजवलेल्या वाहनावरती श्रीरामाची प्रतिमा ठेवण्यात आली होती, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
सायंकाळी सहा वाजता जय योगेश्वर मंडप येथे कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी आयोजित विराट हिंदू संमेलनात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
संत आशीर्वचनासाठी मा. श्री. कैलासजी महाराज उपस्थित होते. त्यांनी हिंदू धर्माची महान परंपरा, संस्कृतीचे जतन आणि समाजातील एकतेचे महत्त्व अधोरेखित केले
विशेष अतिथी मा. श्री. जितेंद्रदादा पाडवी यांनी आपल्या भाषणात तळोदा तालुक्यातील रावलापाणी येथील आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास उलगडून सांगितला. त्यांनी नमूद केले की, १९४३ साली रावलापाणी येथे ब्रिटिश सत्तेविरोधात आदिवासी बांधवांनी मोठा संघर्ष उभारला होता. या आंदोलनावर ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात अनेकांनी बलिदान दिले, ज्यामुळे रावलापानी हे आदिवासी क्रांतीचे प्रतीक बनले आहे.
“आरती पूजा ही हिंदू धर्मात दिलेली परंपरा आहे. संत गुलाब महाराज यांनी हिंदू समाज एकत्र राहावा यासाठी या परंपरांना चालना दिली. आदिवासी समाज वेगळा नसून तो हिंदूच आहे.” – मा. श्री. जितेंद्र दादा पाडवी (आप की जय परिवार प्रमुख, रंजनपूर)
यावेळी संत गुलाब महाराज व संत रामदास महाराज यांच्या कार्याचाही उल्लेख करण्यात आला. हिंदू समाज एकत्रित राहण्यासाठी त्यांनी दिलेले संदेश आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
मार्गदर्शक वक्ते मा. श्री. पुरुषोत्तमजी वसंत काळे यांनी हिंदू समाजातील एकता, सामाजिक समरसता आणि संस्कृतीचे जतन यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांनी संघटित राहून समाजकार्य करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले होते. उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. आयोजकांच्या नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वी ठरला.
एकूणच, हनुमान जयंतीनिमित्त बोरद येथे पार पडलेले हे संमेलन धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक जाणिवा जागृत करणारे ठरले. रावलापानीच्या क्रांतिकारक इतिहासाची आठवण आणि एकतेचा संदेश यामुळे हा कार्यक्रम विशेष ठरला.









