छाया :-माथेरान ई रिक्षा
माथेरान शहर प्रतिनिधी :- दत्ता शिंदे
दस्तुरी ते माथेरान रेल्वे स्टेशन पर्यंत ई रिक्षासाठी प्रति प्रवासी ३५ रुपये इतका दर केवळ अडीच किलोमीटर अंतराकरिता आकारण्यात येत असल्यामुळे दरदिवशी कमीतकमी जवळपास दोन ते तीन हजार रुपयांची कमाई ई रिक्षा चालकांना होत असते.तर अन्य सुट्ट्यांच्या हंगामात त्यापेक्षाही अधिक उत्पन्न प्राप्त होते.शासन नियमानुसार अडीच किलोमीटर अंतरासाठी प्रति प्रवासी ३५ रुपये ही रक्कम जास्त आहे परंतु अन्य वाहनांच्या तुलनेत एक स्वस्त वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे याबाबत कुणीही आक्षेप अथवा तक्रार करत नाहीत.बॅटरीवर चालणाऱ्या या ई रिक्षांची संख्या सद्यस्थितीत वीस इतकी असून यातील काही ई रिक्षा तांत्रिक कारणास्तव दुरुस्तीसाठी नेल्या जातात, काही ई रिक्षा चार्जिंग करिता उभ्या असतात. अनेकदा जेमतेम सात ते आठ रिक्षा सुरळीत चालू असतात.स्वस्त आणि सुरक्षित जलद प्रवासाच्या दृष्टीने प्रवाशी ई रिक्षांची वाट पहात उभे असतात.गावातील सर्वच मंडळी यामध्ये ह्या ई रिक्षांच्या सेवेला सुरुवातीपासून विरोधात आहेत ती मंडळी सुद्धा प्रामुख्याने याच सेवेला सहकुटुंब प्राधान्य देताना दिसत आहेत. येणाऱ्या पर्यटकांना,
आबालवृद्ध नागरिकांना दस्तुरी नाक्यावर उन्हातान्हात रांगेत उभे राहावे लागते. त्यातच शासकीय अधिकारी, कर्मचारी आल्यास त्यांना प्रथमता मोफत सेवेचे प्राधान्य त्यांच्या कार्यालयापर्यंत दिले जाते यावरून अनेकदा स्टँडवर कलह निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. माथेरान रेल्वे स्टेशन आणि दस्तुरी नाक्यावर ऐनवेळी प्रवाशांची वाट पहात हे रिक्षा चालक उभे असतात त्यावेळी दुसऱ्या बाजूला रेल्वे स्टेशन जवळील स्टँडवर प्रवासी रिक्षांची वाट पहात असतात त्यावेळी दस्तुरी नाक्यावर असणारे रिक्षा चालक विना भाड्याचे यायला तयार नसतात त्यांना दोन्ही बाजूंनी भाडे हवे असते त्यासाठी रिकामे यायला सहसा कुणी तयार नसते त्यामुळेच प्रवाशांना ताटकळत रिक्षांची प्रतीक्षा करावी लागत आहे. बॅटरी वर चालणाऱ्या रिक्षा असताना देखील बहुतेक रिक्षा चालक प्रवाशांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी असमर्थता दर्शवित आहेत. ज्या स्थानिकांनी आर्थिक योगदान दिल्यामुळे,वेळोवेळी आंदोलनात सहभागी झाल्यामुळेच ह्या ई रिक्षा सुरू आहेत.ज्या ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारली आहे याची जाणीव हे रिक्षा चालक आता पूर्णपणे विसरून गेले आहेत. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.








