पाथरी (प्रतिनिधी) अहमद अन्सारी पाथरी परभणी
“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या उदात्त भावनेतून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर अंतर्गत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त पाथरी शहरातील शिवाजीनगर येथे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्रात अखंड जप, नामस्मरण व यज्ञ सप्ताह सुरू असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
या सप्ताहादरम्यान सामाजिक बांधिलकी जपत दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या या पवित्र कार्यात हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सप्ताहात दररोज अखंड नामजप, धार्मिक विधी, प्रवचन व भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरू असून भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. त्याचबरोबर रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे.
रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, त्यामुळे प्रत्येकाने पुढाकार घेऊन या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.


