(पालघर जिल्हा प्रतिनिधी श्री केविल पाटील)
बोईसर: पालघर तालुक्यातील मान गावात प्रस्तावित विराज प्रकल्पाच्या जनसुनावणीदरम्यान नागरिकांचा संताप अक्षरशः फुटल्याचे चित्र पाहायला मिळाले. जनसुनावणी सुरू होताच संघर्ष समितीने तीव्र विरोध दर्शवत नारेबाजी केली आणि बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या प्रचंड विरोधामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
सकाळी सुमारे ११ वाजता जनसुनावणीला सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे उपस्थित होते. मात्र, सुनावणी सुरू असतानाही स्थानिकांकडून सतत नारेबाजी सुरूच होती, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. या जनसुनावणीत विराज प्रोफाईल्स कंपनीच्या विरोधात मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला होता. विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती आणि महिलांकडूनही कडाडून विरोध करण्यात आला.
सुरक्षेच्यादृष्टीने सकाळपासूनच पोलिसांकडून जनसुनावणी स्थळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कसून तपासणी करण्यात येत होती. जनसुनावणीदरम्यान विराज प्रोफाईल्स कंपनीकडून पालघर तालुक्यातील विविध गावांमध्ये करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती सादर करण्यात आली.
यामध्ये आरोग्य शिबिरे, कौशल्य विकास योजना तसेच रोजगार मेळाव्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
