तालुका प्रतिनिधी सेलू…
शंकर पानबुडे
येथील तरुण अभियंता अतुल देवळे (वय ४७) यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे पाच जणांना नवे आयुष्य मिळाले. या घटनेमुळे दु:खाच्या काळातही मानवतेचा आदर्श निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल देवळे हे ४ एप्रिल रोजी मित्रांसोबत दुचाकीने जात असताना एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवस डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र उपचारादरम्यान त्यांना ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आले.
या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा निर्णय घेत अवयवदानास संमती दिली. यानंतर यकृत, दोन्ही किडनी आणि दोन्ही नेत्र (डोळे) दान करण्यात आले.
वैद्यकीय समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये एका ५४ वर्षीय रुग्णाला यकृत, दोन वेगवेगळ्या रुग्णांना किडनी तर दोन जणांना नेत्रदानाद्वारे दृष्टी मिळाली.
अतुल यांच्या पश्चात पत्नी रजनी, दोन मुली अशी कुटुंबीय आहेत. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.
२०१३ पासून नागपूर विभागात हे १९३ वे अवयवदान असून, अशा प्रकारच्या निर्णयामुळे अनेकांचे जीव वाचत आहेत. अतुल देवळे यांच्या अवयवदानामुळे त्यांचे आयुष्य जरी थांबले असले तरी त्यांच्या अवयवांच्या माध्यमातून ते पाच जणांच्या रूपाने जिवंत राहणार आहेत.
