शिरूर तालुका प्रतिनिधी — गणेश पाचंगे
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या रांजणगाव एमआयडीसी परिसरात सध्या कुशल आणि अकुशल कामगारांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. आशिया खंडातील महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतींपैकी एक असलेल्या या एमआयडीसीमध्ये कामगारांची कमतरता भासत असल्याने उद्योग क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा स्थानिक परिस्थितीवर परिणाम होत असून, इराण-अमेरिका तणावामुळे इंधन आणि घरगुती गॅसच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पूर्वी सुमारे 950 रुपयांना मिळणारा गॅस काळ्या बाजारात 4,500 ते 5,000 रुपयांपर्यंत विकला जात असल्याचे समोर आले आहे.
या वाढलेल्या महागाईचा सर्वाधिक फटका परप्रांतीय कामगारांना बसत आहे. रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक कामगारांनी आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे. “खायचे काय आणि घरी पैसे पाठवायचे काय, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे,” असे कामगार विजय कुमार यांनी ‘सारथी महाराष्ट्र’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
कामगारांच्या या पलायनामुळे कॉन्ट्रॅक्टर आणि उद्योग व्यवस्थापनाचे धाबे दणाणले असून उत्पादन प्रक्रियेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आणि उद्योग क्षेत्राने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
