पैठण : प्रतिनिधी (बाळू दौंड)
पैठण तालुक्यात मंगळवारी सायंकाळी सुमारे सहा वाजेच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुलतानपूरसह परिसरातील अनेक गावांना या पावसाचा फटका बसला.
अचानक आलेल्या वादळी पावसामुळे गावांमध्ये विजेचे खांब व झाडे घरांवर कोसळून काही घरांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
काढणीला आलेल्या गहू, हरभरा, बाजरी, ज्वारी, कांदा तसेच डाळिंब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पैठण परिसरातील गेवराई, मर्द अडुळ, आगलावे, खादगाव, पारूनी तांडा, कडेठाण, लिमगाव, रांजणगाव आणि सुलतानपूर या भागांमध्ये अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
दरवर्षी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. उत्पादन खर्च वाढत असताना पिकांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अधिकच कर्जबाजारी होत असल्याचे चित्र आहे.
शासनाने विविध योजना राबविण्याबरोबरच शेतमालाला हमीभाव देण्यावर भर दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
