हिंगोली : प्रतिनिधी (राजू धायगुडे)
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात आज सकाळी सुमारे 8:40 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. खापरखेडा परिसरात हा धक्का अधिक तीव्रतेने जाणवल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.
भूकंपाच्या धक्क्यावेळी मोठा आवाजही ऐकू आल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी घराबाहेर धाव घेत सुरक्षित स्थळी आश्रय घेतला.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
