नांदेड : प्रतिनिधी
महाराष्ट्र धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी मल्हार श्री दिपक बोराडे यांनी सलग दहा दिवस आमरण उपोषण करून आपले आंदोलन तीव्र केले. त्यांच्या या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सकल धनगर जमातीच्या वतीने त्यांच्या कार्याचे अभिनंदन करण्यात आले असून “जय मल्हार, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र” अशा घोषणांनी समाजातील ऐक्य व भावना व्यक्त करण्यात आल्या.
उपोषणाच्या अंतिम टप्प्यात समाजातील अनेक लहान-मोठे नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला बळ मिळाल्याचे समाजबांधवांकडून सांगण्यात आले.
या वेळी दिपक बोराडे यांच्या उपोषणाला सहकार्य करणाऱ्या सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले. समाजाच्या मागण्यांसाठी भविष्यातही एकजूट ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच आंदोलनादरम्यान कोणत्याही नेत्यांबाबत चुकीच्या प्रतिक्रिया किंवा पोस्ट टाळाव्यात, असेही आवाहन करण्यात आले.
दरम्यान, पुढील आंदोलनात्मक कार्यक्रम आणि उपोषणाच्या तारखा ठरवताना वरिष्ठ नेते व मान्यवरांशी चर्चा करून नियोजन करावे, अशी विनंतीही समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
शेवटी “जय मल्हार, जय अहिल्या” अशा घोषणांनी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.



