प्रतिनिधी : महाराष्ट्रातील बहुजन समाजाला सामाजिक व राजकीय स्तरावर एकत्र आणण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने जेजुरी येथे ‘बहुजन परिवार संवाद मेळावा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी मल्हार नाट्यगृह, जेजुरी येथे पार पडणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपीचंद पडळकर राहणार आहेत.
बहुजन समाजाला आपले प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात एकत्रित लढा उभारणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः इतर मागास व भटक्या-विमुक्त प्रवर्गातील समाजाच्या प्रतिनिधित्वाच्या प्रश्नावर चर्चा करून ठोस भूमिका घेण्यात येणार आहे.
या मेळाव्यात जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांना विधान परिषदेत संधी देण्याबाबत ठराव मांडण्यात येणार असून, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी रोहित खोमणे, तर निमंत्रक म्हणून अंकुश जाधव कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून हजारो बहुजन समाज बांधव या मेळाव्यात सहभागी होणार असून विविध समाजघटक पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्याची सुरुवात आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला अभिषेक करून रॅलीने होणार आहे. ही रॅली नंदी चौक, मुख्य चौक मार्गे मल्हार नाट्यगृह येथे दाखल होईल. त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा होऊन बहुजन समाजाच्या हक्कांसाठी एकजूट करण्याचा संदेश दिला जाणार आहे.
तसेच कार्यक्रमादरम्यान मल्हारी मार्तंडाच्या चरणी समाजाच्या मागण्यांचे साकडे घालण्यात येणार असून अखेरीस महाराष्ट्र गीताने समारंभाची सांगता होणार आहे.




