उपहेडलाईन:
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळा; मुरुडकर बंधूंच्या२५ वर्षांच्या कलेचा गौरव
बातमी:
मुंबई : कोकणच्या मातीत रुजलेली आणि कोळी-आगरी समाजाच्या परंपरेशी घट्ट नाळ जुळलेली ‘खालुबाजा’ ही लोककला मुंबईत दिमाखात सादर होत, सांस्कृतिक उत्सवाचा अविस्मरणीय अनुभव देऊन गेली. त्रिमूर्ती संदेश खालुबाजा पथकाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रम रविवारी (५ एप्रिल २०२६) सांताक्रूझ (पूर्व) येथील पाठक टेक्निकल कॉलेज हॉलमध्ये उत्साहात पार पडला.
या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले, तर कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषवले. खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणातून खालुबाजा या लोककलेचे महत्त्व अधोरेखित करत, या कलाकारांना शासकीय पातळीवर अधिक पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दापोली तालुक्यातील इळणे गावचे सुपुत्र संदेश मुरुडकर आणि रुपेश मुरुडकर या बंधूंनी गेली २५ वर्षे अथक परिश्रमातून ही पारंपारिक कला मुंबईत जिवंत ठेवली आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करत कार्यक्रमात विशेष पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कुलगुरू डॉ. अर्जुन मुरुडकर यांनी मार्गदर्शन करत कलेच्या जतनासाठी प्रेरणादायी विचार मांडले.
कार्यक्रमात ‘त्रिमूर्ती संदेश’ खालुबाजा पथकाने सादर केलेल्या पारंपारिक सादरीकरणांनी प्रेक्षकांची मने जिंकली. टिमकीच्या ठेक्यावर सादर झालेले कोळी नृत्य, लेझीम आणि महिलांचे समई नृत्य यामुळे संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले. बिग बॉस फेम दादूस (गोल्ड मॅन) यांच्या कोळीगीतांनी वातावरणात रंगत आणली.
‘खेळ पैठणीचा’ या उपक्रमातून विजेत्या महिलांना पैठणीसह आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मुरुडकर कुटुंबीयांच्या एकोप्याचे आणि कलेप्रती असलेल्या समर्पणाचे सर्व स्तरांतून कौतुक झाले.
या सोहळ्याला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कोळी समाजातील मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मुंबईसारख्या महानगरात कोकणातील लोककला जिवंत ठेवणाऱ्या मुरुडकर बंधूंच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, हा रौप्य महोत्सव नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहकारी, मान्यवर आणि प्रसारमाध्यमांचे मुरुडकर बंधूंनी आभार मानले.


