🟠 २२ ते २४ एप्रिल दरम्यान धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; ना. योगेशदादा कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती निश्चित
दापोली (प्रतिनिधी:राकेश.चिलबे)
कोकणातील हिरव्यागार डोंगररांगा, निसर्गरम्य दऱ्या आणि शांत वातावरणाच्या कुशीत वसलेले दापोली तालुक्यातील आंबवली बुद्रुक हे गाव लवकरच भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाच्या रंगांनी उजळून निघणार आहे. ग्रामदैवत श्री काळेश्वरी देवी मंदिराचा जिर्णोद्धार आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. २२ ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असून, या सोहळ्याकडे संपूर्ण कोकणासह राज्यभरातील भाविकांचे लक्ष लागले आहे.
आंबवली सांस्कृतिक सेवा मंडळ (रजि.) तसेच समस्त ग्रामस्थ (ग्रामीण व मुंबई मंडळ) यांच्या संयुक्त पुढाकारातून साकारलेला हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता, गावाच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा आणि परंपरेच्या जतनाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे. डोंगरांच्या कुशीत नव्याने उभारलेले मंदिर हे आंबवलीच्या अस्मितेचे आणि श्रद्धेचे भव्य प्रतीक म्हणून उभे राहिले आहे.
सोहळ्याची सुरुवात बुधवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता पारंपरिक धार्मिक विधींनी होणार आहे. सकाळी ११ वाजता मंदिर उद्घाटनाचा मुख्य सोहळा संपन्न होईल. त्यानंतर काढण्यात येणारी देवीची भव्य मिरवणूक गावातील प्रत्येक रस्त्यावरून जात भक्तीमय वातावरण निर्माण करणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांची समृद्ध मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. पहिल्या दिवशी स्थानिक कलाकारांच्या सहभागातून सांस्कृतिक कार्यक्रम व भजन संध्या रंगणार आहे. दि. २३ एप्रिल हा सोहळ्याचा मुख्य दिवस असून सकाळी ९ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहे. सायंकाळी महाआरतीनंतर रात्री ‘बुवा-जहांगीर (आतगाव)’ यांचा भजनाचा सामना भक्तांना अध्यात्मिक आनंदाची अनुभूती देणार आहे.
सोहळ्याच्या सांगता दिनी म्हणजेच दि. २४ एप्रिल रोजी पहाटेच्या प्रसन्न वातावरणात काकड आरती, मान्यवरांचा सत्कार आणि महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी रात्री ‘अस्तित्व महाराष्ट्राचं’ प्रस्तुत ‘रामायण’ हे भव्य महानाट्य सादर होणार असून सोहळ्याची सांगता दिमाखात होणार आहे.
भाविकांसाठी विशेष आकर्षण म्हणून शुक्रवार दि. २४ एप्रिल रोजी दुपारी व रात्री अशा दोन सत्रांमध्ये महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला असून, हजारो भाविक या प्रसादाचा लाभ घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या भव्य सोहळ्यासाठी राज्याचे राज्यमंत्री ना. श्री. योगेशदादा कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष प्रतिष्ठा लाभणार आहे. तसेच विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतींचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कोकणातील निसर्गरम्य डोंगरदऱ्यांच्या साक्षीने उभा राहणारा हा सोहळा परंपरा, श्रद्धा आणि एकात्मतेचा संदेश देणारा ठरणार आहे. पुढील पिढीपर्यंत आपली संस्कृती आणि आध्यात्मिक वारसा पोहोचवण्याच्या उद्देशाने आंबवलीकरांनी घेतलेला हा पुढाकार निश्चितच प्रेरणादायी मानला जात आहे. या ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्थळ: मु. आंबवली बुद्रुक, पो. केळशी, ता. दापोली, जि. रत्नागिरी.
