कल्याण-डोंबिवली (प्रतिनिधी) : शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी क.डो.म.पा. प्रशासनाने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडून विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत कुत्र्यांच्या निर्बीजिकरणासाठी विशेष मोहीम राबविणे, लसीकरण अभियान सुरू करणे, डॉग सेंटर उभारणे, तसेच आक्रमक कुत्र्यांसाठी क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय येत्या एका वर्षात भटक्या कुत्र्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या सर्व मोहिमांची अंमलबजावणी येत्या मे महिन्यापासून सुरू होणार असून, नागरिकांमध्ये जनजागृती करून पाळीव कुत्र्यांबाबत जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यावरही भर देण्यात येणार आहे.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. सुरक्षित आणि सुसंस्कृत शहर घडवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस सभागृह नेते वरुणजी पाटील, गटनेते विश्वनाथजी राणे, नगरसेविका खुशबू चौधरी तसेच उपायुक्त प्रसाद बोरकर उपस्थित होते.










