कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-मुरबाड रोडवर झालेल्या भीषण अपघातात दिवा येथे वास्तव्यास असलेल्या मोहपे कुटुंबातील तीन भावंडांचा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मूळचे मुरबाड तालुक्यातील असलेल्या या कुटुंबातील नेहा (२२), मानसी (२०) आणि प्रथमेश (१७) ही तिघे भावंडे गावाकडील हळदी समारंभ व लग्नासाठी पर्हे (कांदली) येथे जात होते. मात्र, नियतीने त्यांच्यावर घाला घालत हा प्रवासच त्यांचा शेवटचा ठरला.
वडिलांच्या निधनानंतर आई अंजना यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत घरकाम करून आपल्या मुलांना मोठे केले होते. मुलांनीही कष्टाने शिक्षण घेतले आणि नोकरी करून आईला आधार देण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, या अपघाताने त्यांच्या सर्व आशा एका क्षणात संपुष्टात आल्या.
प्रथमेशने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. सुट्टीचा आनंद आणि गावाची ओढ यामुळे तिघेही उत्साहात निघाले होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ही बातमी तिला अद्याप देण्यात आलेली नसल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली असून, परिसरात शोककळा पसरली आहे.










