अतनूर (प्रतिनिधी) : अतनूर (ता. जळकोट) येथे ‘सामाजिक समता सप्ताहा’निमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देत त्यांना वैचारिक अभिवादन करण्यात आले.
यावेळी शासननियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तथा दलितमित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे यांनी आंबेडकरवाद हा देशातील शोषित, पीडित आणि वंचितांचा ‘राष्ट्रभाषा’ बनत असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, “डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रवाद हाच खरा राष्ट्रवाद असून, त्यातूनच न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे राज्य निर्माण होऊ शकते.”
जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन समिती महाराष्ट्र राज्य, वसुंधरा महिला मंडळ व जिजामाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत प्रेरणादायी व्याख्यान, संविधान प्रास्ताविक वाचन तसेच निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
प्रमुख वक्त्या म्हणून जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. संध्या शिंदे व वसुंधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रुक्मिणबाई सोमवंशी यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक समतेचे महत्त्व पटवून दिले. “समाजातील विषमता दूर करण्यासाठी शिक्षणासोबतच जागरूकता आणि संवेदनशीलता आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. जी. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना परदेशातील शिष्यवृत्तींचा लाभ घेण्याचे आवाहन करत, समताधिष्ठित समाज घडवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका गायकवाड व मयुरी शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. भरत बिरादार यांनी मानले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते, महिला, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










