चंदगड (प्रतिनिधी) : “जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात. चंदगड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,” अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
रामपूर येथे आयोजित नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेश पाटील होते.
‘चंदगडी पॅटर्न’ची दखल
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून दिले असून, ‘चंदगडी पॅटर्न’मुळे परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. हा विश्वास कायम ठेवण्याचे काम पक्ष करेल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी नूतन सभापती विलास नाईक यांनी तालुक्यातील रिक्त पदे तातडीने भरून विकासकामांना गती देण्याची मागणी केली.
शक्तिपीठ महामार्गावर टीका
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार राजेश पाटील यांनी नूतन प्रतिनिधींना जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा सल्ला दिला. तसेच ‘शक्तिपीठ महामार्ग’ प्रकल्पावर टीका करत हा प्रकल्प परिसराच्या निसर्गासाठी घातक ठरू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकरी आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब आसुर्लेकर, महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, जिल्हा परिषद सदस्य संग्राम कुपेकर, सुधीर देसाई, अमर चव्हाण, गडहिंग्लज सभापती प्रतिभा चव्हाण, सुखदेव शहापूरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र शिवणगेकर यांनी केले.










