आजरा (प्रतिनिधी) : शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणाविरोधात आजरा नगरपंचायत प्रशासनाने सोमवारी धडक कारवाई करत आक्रमक भूमिका घेतली. वारंवार सूचना देऊनही दुकानाबाहेर गटर्सच्या पलीकडे साहित्य मांडणाऱ्या व्यापाऱ्यांचे साहित्य जप्त करण्यात आले, त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
शहरातील अनेक व्यापारी व विक्रेते सूचना देऊनही आपले साहित्य रस्त्यावर ठेवत होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढत होता. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने कारवाई करत रस्त्यावर अडथळा ठरणारे साहित्य जप्त करून ते नगरपंचायत कार्यालयात जमा केले.
दरम्यान, कारवाईनंतर व्यापाऱ्यांनी नगरपंचायत प्रशासनाची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी निहाल अत्तार, प्रदीप नाईक, परेश पोतदार, परशुराम बामणे, किरण कांबळे यांसह अन्य व्यावसायिक उपस्थित होते. “यापुढे रस्त्यावर साहित्य ठेवणार नाही,” अशी लेखी हमी दिल्यानंतर प्रशासनाने जप्त साहित्य परत केले.
नगरपंचायतीने व्यापाऱ्यांना स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, व्यवसायाचे कोणतेही साहित्य गटर्सच्या बाहेर ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये. नियमांचे उल्लंघन झाल्यास यापुढे अधिक कठोर कारवाई केली जाईल.










