आजरा (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आजरा बस स्थानकावर सामाजिक बांधिलकी जपणारा हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सुभाष कांबळे व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने प्रवासी आणि पोलीस बांधवांसाठी थंडगार पाणी व गोड जिलेबीचे वाटप करण्यात आले.
कडक उन्हात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थंड पाण्याचा दिलासा मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही या उपक्रमातून दिलासा मिळाला.
या उपक्रमामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी विचारांची प्रेरणा असल्याचे आयोजकांनी सांगितले. “पाणी हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे आणि त्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला,” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी स्वप्निल कांबळे, सचिन कांबळे, जितू कांबळे, शिवराज लोखंडे (वझरे), अभिजीत शिंदे, विशाल कांबळे, श्रीधर कांबळे, अक्षय माळी, अभिजीत कांबळे तसेच बुरुडे गावातील ऋषिकेश कांबळे, कुणाल कांबळे, स्वप्नील कांबळे, साहिल कांबळे आदी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम केवळ सेवा नसून माणुसकीचा जिवंत उत्सव ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.










