दर्यापूर (प्रतिनिधी)
दर्यापूर येथील साई नगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेजवळ नालीचे पाणी साचल्याने गंभीर समस्या निर्माण झाली असून, यामुळे विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाला आहे.
साचलेल्या पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी सापही निघत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत नगर परिषद प्रशासनाला वारंवार कळवूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. नगरसेवकांनीदेखील प्रत्यक्ष पाहणीस येण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शाळेजवळील ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून, लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित असल्यामुळे तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. संबंधित प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन नालीची स्वच्छता करावी, साचलेले पाणी त्वरित काढावे आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.








