दर्यापूर (प्रतिनिधी) :
दर्यापूर येथील साई नगर जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात साचलेल्या नालीच्या पाण्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे. साचलेल्या घाण पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून शाळेतील विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी वारंवार नगरपरिषदेला याबाबत कळवूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. नालीतील पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून साप देखील परिसरात आढळत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, संबंधित नगरसेवकांनीही या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून लवकरात लवकर या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
स्थानिकांच्या मते, शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून नगरपरिषद प्रशासनाने तातडीने कारवाई करून नालीची स्वच्छता व योग्य निचरा व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.











