श्रीरामपूर (प्रतिनिधी) :
श्रीरामपूर तालुक्यातील घुमनदेव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गाव लहान असले तरी जयंती उत्सवात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत एकोप्याचा आदर्श निर्माण केला.
या निमित्ताने उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा जागर करत त्यांनी दिलेली शिकवण, संविधानातील तत्त्वे व मूल्ये अंगीकारण्याचा संकल्प केला. कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर भर देण्यात आला.
विशेष म्हणजे, गावातील सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी एकत्र येत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या एकात्मतेमुळे जयंती उत्सवाला विशेष रंगत प्राप्त झाली. घुमनदेव गावाने या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा प्रेरणादायी संदेश दिला.










