कन्नड (तालुका प्रतिनिधी) :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कन्नड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत रेल-कारखाना येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी सा. पिंपळपान चे संपादक अशोक पवार यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर भाष्य करत, “बाबासाहेबांचे जीवन म्हणजे मांगल्याचे माहेर आणि संघर्षाचा सागर आहे,” असे प्रभावी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात भंते यांच्या हस्ते बुद्ध वंदनेने करण्यात आली. यावेळी अशोक पवार यांनी मिलिंद कॉलेजच्या उभारणीदरम्यानचा एक प्रसंग सांगत बाबासाहेबांची कार्यतत्परता आणि दूरदृष्टी अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, बाबासाहेब आणि त्यांच्या पत्नी माई मुंबईहून औरंगाबाद येथे येऊन स्वतः बांधकामावर लक्ष ठेवत असत. आपल्या देखरेखीखाली त्यांनी मिलिंद कॉलेज उभारले, हे त्यांच्या शिक्षणावरील निष्ठेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणाच्या जोरावर भारतीय संविधान तयार करून समाजातील तळागाळातील घटकांना समानतेचा हक्क मिळवून दिला, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपसरपंच यांनी मनोगत व्यक्त करत जयंतीनिमित्त “बंद पाकीट” देणगी म्हणून भंते यांच्या हस्ते जयंती समितीकडे सुपूर्द केले. मात्र, त्या पाकिटातील रक्कम जाहीर न केल्याने उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल इंगळे, संजय भालेराव, राजू धनेधर, गौतम भालेराव, युसुफ शेख, दिनकर जाधव, दिनकर बनसोडे, शरद थोरात, आकाश बोर्डे तसेच महिला भगिनींनी परिश्रम घेतले. कारखाना, गौतम नगर व कनकावतीनगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.











