माहूर (प्रतिनिधी) :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त माहूर शहरात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडले. याच पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या गेटसमोरील स्व. पिपळीबाई पूरसिंग राठोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या श्री दत्तकृपा प्रतिष्ठान येथे खीरदानाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
संचालक विजय भाऊ कांबळे यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात दिवसभर आलेल्या सर्व नागरिकांना खीर वाटप करण्यात आले. माहूर शहरात अन्नदानासाठी ओळख असलेल्या या प्रतिष्ठानच्या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत खीरदानाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सभापती संजय राठोड, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुदर्शन नाईक, भाजपचे डॉ. निरंजन केशवे, अनिल वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, पत्रकार विजय आमले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कुंदन राठोड, पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, शहरात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले तसेच भव्य मिरवणुकांद्वारे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.









