कडेगाव (प्रतिनिधी) :
समाज, सैनिक आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कार्य करण्याच्या उद्देशाने सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशनच्या वतीने कडेगाव येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एकाच वेळी तब्बल ७०० शाखांचा शुभारंभ संस्थापक अध्यक्ष मेजर मनोजकुमार डांगे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला फाउंडेशनचे उपाध्यक्ष निलेश निकम, सचिव संजय सतई, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश पाटील, महिला सक्षमीकरण प्रमुख स्वाती बोराटे, जिल्हाध्यक्ष जयंत मैदानकर, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा वाघमोडे, आरोग्य महासंचालक चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थापक मनोजकुमार डांगे यांनी फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. सैनिक शेतकरी सुकन्या योजना, अंतिम सन्मान योजना, आरोग्य योद्धा उपक्रम, व्यसनमुक्ती अभियान, कचरा मुक्त भारत अशा योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती व महिला सक्षमीकरण साध्य करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सैनिक आणि शेतकऱ्यांनी संघटन बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मीडिया प्रमुख नारायण वाघमोडे यांनी सांगितले की, राज्यभर पाच हजारांहून अधिक शाखा असलेल्या या फाउंडेशनने सांगली जिल्ह्यात एकाचवेळी ७०० शाखांचा शुभारंभ करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
या मेळाव्यासाठी तासगाव, खानापूर, जत, कवठेमहांकाळ, वाळवा, शिराळा, आटपाडी, कडेगाव आदी तालुक्यांमधील पदाधिकारी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.











