नांदगाव खंडे, ता. (प्रतिनिधी):
अमरावती जिल्ह्यातील मौजा खेड पिंपरी येथे यंदा प्रथमच सर्वधर्मसमभावातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावात यापूर्वी जयंती कार्यक्रम मर्यादित स्वरूपात होत असताना, यंदा सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांच्या पुढाकारातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
यासाठी मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्याशी समन्वय साधून परवानगी घेण्यात आली. जयंतीनिमित्त १३ एप्रिल रोजी सुमारे १००० ग्रामस्थांसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गावात एकोपा वाढविण्याच्या उद्देशाने सर्वधर्मसमभाव रॅली काढण्यात आली, ज्यात सर्व धर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नवउत्सव दुर्गा महिला मंडळाच्या वतीने चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही मिरवणूक सर्व धर्मीय नागरिकांच्या वर्गणीतून आयोजित करण्यात आली होती. धार्मिक गीतांच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश देत बाबासाहेबांना मानवंदना अर्पण करण्यात आली.
“गावातील जाती-धर्म भेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन महामानवांच्या जयंती साजऱ्या केल्यास गावाच्या विकासाला चालना मिळते,” असे प्रतिपादन सरपंच मंगेश कांबळे यांनी यावेळी केले.
कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी मंगरूळ चव्हाळा येथील पोलीस अधिकारी श्रृंगारे यांचे सहकार्य लाभले. तसेच मिरवणुकीसाठी मोफत ट्रॅक्टर उपलब्ध करून देणारे प्रवीण इंगळे, चालक अक्षय जाधव, तसेच चहा-पाणी व्यवस्था करणारे गौरव चौधरी व संतोष चौधरी यांचा सत्कार सद्धम्म महिला मंडळाच्या वतीने करण्यात आला.
या भव्य जयंती उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सद्धम्म महिला मंडळ, युवक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमानंतर गावात एकोप्याचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी सत्यशील इंगळे, अजय वाघमारे, हंसराज कांबळे, तुळशीदास खांडेकर, रामदास खांडेकर, सुरेश कांबळे, श्रीकृष्ण देशकर, संदीप पाटील, दिलीप किर्दक, शंकर वाघमारे, प्रशांत पाटील, सिद्धार्थ कांबळे, सचिन काकडे, गणेश चहांदे तसेच प्रतिमा वाघमारे, उज्वला किर्दक, कांताबाई इंगळे, मंगला कांबळे, संगीता खांडेकर, सुहाना पाटील, कुसुम खांडेकर, कौशल कांबळे, वर्षा अंबाडारे, प्रतिमा जवंजळ आदींसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.









