[]कॉटनचे सैल कपडे, भरपूर द्रवपदार्थ आणि दुपारच्या उन्हापासून दूर ठेवणे अत्यावश्यक[]
मानवत : प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
दिनांक १६एप्रिल
राज्यात तसेच मानवत शहरात सध्या उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला असून उष्णतेचा तीव्र परिणाम नागरिकांवर जाणवत आहे. विशेषतः लहान बालकांसाठी हा काळ अधिक धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे बालकांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत मानवत येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. विठ्ठल काळे यांनी व्यक्त केले आहे…..
डॉ. काळे यांनी सांगितले की, लहान मुलांची शारीरिक प्रतिकारशक्ती कमी असते तसेच त्यांची त्वचा अतिशय नाजूक असते. त्यामुळे उष्णतेमुळे त्यांना त्वचारोग, घामोळे, उष्माघात (हीट स्ट्रोक), तसेच शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. काही वेळा ही स्थिती गंभीर होऊ शकते, त्यामुळे पालकांनी विशेष सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात बालकांना सैल, हलक्या रंगाचे आणि कॉटनचे कपडे परिधान करणे अत्यंत आवश्यक आहे. सिंथेटिक किंवा घट्ट कपडे टाळावेत. कॉटन कपड्यांमुळे शरीराला हवा खेळती राहते आणि घाम शोषला जातो, त्यामुळे त्वचेचे विकार टाळता येतात…..
सकाळी १२ ते दुपारी ०४ या वेळेत उन्हाची तीव्रता सर्वाधिक असते. या काळात बालकांना घराबाहेर नेणे टाळावे. अत्यावश्यक असल्यास डोक्यावर टोपी, छत्री किंवा कापड वापरून संरक्षण करावे….
बालकांच्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी वेळोवेळी पाणी, दूध, लस्सी, ताक यांसारखे द्रवपदार्थ द्यावेत. नवजात बालकांसाठी आईचे दूध हेच सर्वोत्तम असल्याचे त्यांनी नमूद केले….
घर थंड व हवेशीर ठेवणे गरजेचे आहे. थेट सूर्यप्रकाश बालकांवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. पंखा, कूलर किंवा आवश्यक असल्यास एसीचा योग्य वापर करावा; मात्र थंड वातावरण अचानक बदलू देऊ नये…..
बालकांमध्ये सतत रडणे, अंग गरम होणे, अशक्तपणा, उलट्या, जुलाब किंवा भूक न लागणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. काळे यांनी सांगितले…..
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. साध्या गोष्टींची काळजी घेतल्यास अनेक आजार टाळता येऊ शकतात. त्यामुळे सर्व पालकांनी जागरूक राहून बालकांचे संरक्षण करावे, असे आवाहन डॉ. विठ्ठल काळे यांनी केले आहे……











