कन्नड तालुका ( प्रतिनिधी)
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणांनी ठरवले तर ते आभाळाला गवसणी घालू शकतात, याचाच प्रत्यय वासडी येथे पाहायला मिळाला. वासडी येथील वैभव ज्ञानेश्वर नरवडे यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली असून, या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वैभव नरवडे यांच्या या यशाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी केतन काजे व मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा मनापासून सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना केतन काजे म्हणाले की, “वैभवने अत्यंत कष्टाने हे यश संपादन केले आहे. त्याच्या निवडीमुळे वासडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, गावातील इतर तरुणांनाही यातून मोठी प्रेरणा मिळेल.”
या सत्कार सोहळ्याप्रसंगी मित्रपरिवारातील सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी वैभव नरवडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या यशाचे श्रेय वैभवने आई-वडील आणि मित्रपरिवाराला दिले आहे.








