अक्राणी प्रतिनिधी : पेसा क्षेत्रातील मोबिलायझर्स पदांच्या कपातीला तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स कडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन शहादा येथील तहसीलदारांना सादर करण्यात आले.
यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष पप्पू अवाया, तसेच जगदीश डुडवे यांच्यासह सुमारे १० कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील पेसा क्षेत्रातील १३ जिल्ह्यांमध्ये ‘पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान’ अंतर्गत ग्रामसभा मोबिलायझर्सची एकूण ३००३ पदे मंजूर होती. मात्र, चालू वर्षापासून प्रत्येक तीन मोबिलायझर्सऐवजी एकच पद मंजूर करण्यात आले असून एकूण पदसंख्या १००१ वर आणण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल २००२ पदांची कपात करण्यात आल्याची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
राज्य व्यवस्थापन कक्ष – पंचायत राज, पुणे यांनी १ एप्रिल २०२६ रोजी संबंधित १३ जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश जारी केल्याचे सांगण्यात आले. हा निर्णय घाईघाईने व कायदेशीर पडताळणी न करता घेण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
या पदकपातीमुळे अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभांच्या सबलीकरणावर थेट परिणाम होणार असून पेसा कायद्यांतर्गत हक्कांवर गदा येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मोबिलायझर्स पदांच्या कपातीच्या आदेशास तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.










