शहादा | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील होळमोहीदा येथे घरात घुसलेल्या बिबट्याचा धाडसाने सामना करून दोन चिमुकल्यांचे प्राण वाचविणाऱ्या वैशाली विशाल भामरे यांच्या शौर्याचा रत्नदीप नागरिक सहकारी पतसंस्था आणि रत्नप्रभा महिला पतसंस्था, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने गौरव करण्यात आला.
ग्रामीण रुग्णालयात जाऊन वैशाली भामरे यांचा शाल, श्रीफळ, साडी तसेच ₹5 हजारांची रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, स्वतः जखमी होऊनही वैशाली भामरे यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याला घरात जेरबंद केले आणि दोन निष्पाप बालकांचे प्राण वाचविले. त्यांचे धाडस समाजासाठी प्रेरणादायी असून अशा धैर्यवान महिलांचा सन्मान होणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या सत्कार कार्यक्रमाला रत्नदीप नागरिक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मण कदम, व्हाईस चेअरमन अरुण बागुल, संचालक पांडुरंगआप्पा गोरे, ॲड. विपुल लक्ष्मण कदम, दशरथ पाटील, वामन चव्हाण तसेच कर्मचारी मोहन मंगू सोनार, तुषार रमेश शास्त्री आणि हेमंत पांडुरंग चौधरी उपस्थित होते.
तसेच रत्नप्रभा महिला पतसंस्थेच्या चेअरमन उषाबाई लक्ष्मण कदम, व्हाईस चेअरमन आरतीबाई अरुण बागुल, संचालिका विद्याबाई अशोक मराठे, सुमनबाई पाडवी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी वैशाली भामरे यांच्या शौर्याचे कौतुक करत त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली आणि त्या लवकर पूर्णपणे बऱ्या व्हाव्यात, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
