प्रतिनिधी :
अकोला शहरातील शिवणी उपनगरात अनेक नागरिकांना गेल्या तीन महिन्यांपासून शासकीय रेशनचा लाभ मिळत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत असून पुरवठा विभागाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कोरोना काळापासून सरकारकडून मोफत रेशन योजना सुरू असतानाही प्रत्यक्षात धान्य वितरण व्यवस्थित होत आहे का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक नागरिक कामाच्या वेळेत रेशन मिळवण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहतात; मात्र वितरणासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिन्स बंद पडत असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागते.
औद्योगिक परिसरात व शेतीकामात गुंतलेले मजूर वेळ काढून रेशन दुकानात पोहोचतात, पण अनेकदा “कोटा संपला” असे सांगितले जाते. परिणामी काहींना तीन महिन्यांचा हक्काचा धान्य कोटाही मिळत नसल्याची तक्रार आहे.
नागरिकांनी उपस्थित केलेले काही गंभीर प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत —
- रेशन दुकानदारांना पुरेसे धान्य मिळते का?
- पुरवठा विभागाकडून नियमित तपासणी होते का?
- नागरिकांचा हक्काचा कोटा कमी दिला जातो का?
- न मिळालेला धान्य कोटा नेमका जातो कुठे?
ऑनलाइन रेशन कार्ड व्यवस्था सुरू असतानाही कामाच्या ठिकाणाजवळील दुकानातून धान्य घेण्याची सुविधा का उपलब्ध करून दिली जात नाही, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पुरवठा विभागावर दरवर्षी मोठा खर्च होत असताना देखील सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन आणि पुरवठा विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून आकस्मिक तपासण्या कराव्यात व कोणताही गरीब किंवा मजूर धान्यापासून वंचित राहणार नाही, याची खात्री करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.










