पातुर ग्रामीण प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील दुर्गम भागातील सोनुना ते चिंचाळा रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी ग्रामस्थांसह १६ तारखेला पातुर तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या कामात निकृष्ट साहित्याचा वापर केला जात असून काम ठरलेल्या तांत्रिक निकषांनुसार होत नाही. त्यामुळे भविष्यात रस्त्याची दुरावस्था होण्याची शक्यता असून शासनाच्या निधीचा अपव्यय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासोबतच नागरिक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.
संबंधित अधिकारी व कंत्राटदारांकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.
🗣️ प्रतिक्रिया
“सोनुना–चिंचाळा रस्त्याच्या कामाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत काम थांबवावे; अन्यथा ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
— निलेश कापकर
या प्रकरणी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.











