एरंडोल (जळगाव) : येथील रा. ति. काबरे विद्यालयात १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी शाळेचे चेअरमन अनिलभाऊ बिर्ला, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमात मुख्याध्यापक एस. एस. राठी यांनी अध्यक्षीय भाषण केले, तर उपमुख्याध्यापक पी. एच. नेटके यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. पर्यवेक्षक पी. एस. नारखेडे यांनी सामाजिक न्याय, समता व संविधान निर्मितीतील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या घोषणेचा विद्यार्थ्यांनी उत्साहात जयघोष केला.
मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात, “डॉ. आंबेडकर हे केवळ दलित मुक्तिदाते नव्हते, तर संपूर्ण भारताच्या समतेचे प्रणेते होते. त्यांच्या विचारांचे पालन करणे हीच खरी श्रद्धांजली आहे,” असे सांगितले.
यानंतर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जाऊन शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिक्षकांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हि. एस. काळे यांनी केले असून, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.









