कन्नड तालुका (प्रतिनिधी):
अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार समितीच्या वतीने वडनेर येथे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने भगवान श्री रामदेवजी बाबा यांच्या सात दिवसीय कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे.
आज या कार्यक्रमास आमदार संजना जाधव यांनी सदिच्छा भेट देत उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी प.पू. संत श्री गोपाल चैतन्य महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. महाराजांनी आपल्या प्रवचनातून अध्यात्मिक विचारांचे महत्त्व पटवून देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन आणि हरिनामाच्या गजराने परिसर दुमदुमला आहे. आमदार जाधव यांनी आयोजकांच्या नियोजनाचे कौतुक करत, “अशा कार्यक्रमांमुळे समाजात एकोपा व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते,” असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी समितीचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. सप्ताहाची सांगता महाप्रसादाने होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.










