तांभा प्रतिनिधी:
वर्धा नदीवरील तांभा येथील पूल जीर्ण अवस्थेत पोहोचल्याने वर्धा आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांमधील संपर्क अक्षरशः तुटला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या पुलामुळे एकेकाळी दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठी सुविधा मिळाली होती. मात्र, सध्या पुलालगतचा रस्ता खचल्याने आणि पुलाच्या काही भागाचे नुकसान झाल्याने नागरिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या धोकादायक परिस्थितीमुळे आतापर्यंत चार ते पाच अपघात घडले असून, त्यात एक ते दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
याशिवाय पुलाच्या बाजूला बसवण्यात आलेले सुरक्षेसाठीचे लोखंडी पाईपही काढून नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांचा दळणवळणाचा मार्ग बंद झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी तांभा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.










