कणकवली (प्रतिनिधी), दि. २० एप्रिल :
कणकवली शहरातील नाथ पै नगर व बिजलीनगर वार्ड परिसरातील श्रीधर नाईक उद्यानाजवळील गड नदीपात्रात सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामाची उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नगरसेवक संकेत नाईक व जयेश धुमाळे उपस्थित होते.
काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना
नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम अत्यंत दर्जेदार व नियोजित वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे सांगत, कामात कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, अशा सक्त सूचना सुशांत नाईक यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
यावेळी नाम फाउंडेशनचे दिग्विजय पाटील तसेच लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता विकास परब उपस्थित होते.
केटी बंधाऱ्यांतील गाळ काढण्याची मागणी
पाहणीदरम्यान उपनगराध्यक्ष नाईक यांनी मराठा मंडळ व कनकनगर येथील केटी बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याची मागणी केली. यावर अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, मराठा मंडळ येथील बंधाऱ्यासाठी यावर्षी आर्थिक तरतूद करण्यात आली असून, कनकनगर येथील गाळ काढण्याचे काम पुढील वर्षी हाती घेतले जाईल.
पाणीसाठा टिकवण्यासाठी उपाययोजना आवश्यक
शहरातील केटी बंधाऱ्यांवर बसवलेल्या लोखंडी प्लेट्समधून पाण्याची गळती होत असल्याने पाणीसाठा टिकत नसल्याची बाबही यावेळी निदर्शनास आली. ही गळती थांबवण्यासाठी जुन्या प्लेट्स बदलून नवीन बसवाव्यात, अशा सूचना सुशांत नाईक यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
शहरातील जलस्रोत सक्षम ठेवण्यासाठी अशा कामांवर विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.









