पांढरकवडा (प्रतिनिधी) :
पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी या सुमारे १२ हजार लोकसंख्या असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतीत कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सुसज्ज असली, तरी प्रत्यक्षात आरोग्यसेवा अत्यंत अपुरी असल्याचे चित्र समोर आले आहे.
२४ तास सेवा केवळ कागदोपत्री
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४लगत असलेल्या पाटणबोरी परिसरात वारंवार अपघात होतात. मात्र सायंकाळनंतर आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने जखमी रुग्णांना तातडीची मदत मिळण्यात अडथळे येतात. केंद्रात केवळ एकच डॉक्टर असून इतर कर्मचारीही अपुरे असल्याने सेवा विस्कळीत होते.
रुग्ण आल्यास आरोग्य सेवक किंवा डॉक्टरांना फोन करून बोलवावे लागते, अशी परिस्थिती आहे.
रिक्त पदांमुळे अडचणी वाढल्या
गेल्या ३ ते ४ वर्षांपासून येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नाहीत. अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. सध्या तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर नेमण्यात आले असले, तरी ते अपुरे ठरत आहेत.
मूलभूत सुविधांचा अभाव
आरोग्य केंद्रात आवश्यक औषधसाठा, पॅथॉलॉजी लॅब, तसेच प्रसूती कक्षातील सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे गंभीर रुग्णांना स्वतःच्या खर्चाने पांढरकवडा किंवा आदिलाबाद येथे हलवावे लागते.
गर्भवती महिलांची परवड
आरोग्य केंद्रात सोनोग्राफी सुविधा नसल्यामुळे गर्भवती महिलांना ४० ते ५० किलोमीटर अंतर पार करून पांढरकवडा येथे जावे लागते.
अलीकडेच रविवारी रात्री ६ ते ७ गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी केंद्रात आल्या असता, केंद्र बंद असल्याने त्यांना खासगी वाहनाने पांढरकवडा गाठावे लागले. या प्रकारामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागला.
प्रशासनाकडे लक्ष वेधण्याची मागणी
वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्णांची परिस्थिती गंभीर होऊ शकते, त्यामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.










