जळकोट (प्रतिनिधी) – जळकोट तालुक्यातील साठवण तलाव परिसरात शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी सोनवळा साठवण तलाव परिसरातील कंरजी हद्दीत सुमारे ६० ते ७० शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल चोरीस गेल्या होत्या. त्यानंतरही चोरीचे प्रकार सुरूच असून, दिनांक २० एप्रिल रोजी डोगरगाव साठवण तलाव परिसरातील तिरुका गावातील शेतकऱ्यांच्या मोटारींच्या केबल चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
या सततच्या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, संतप्त शेतकऱ्यांनी जळकोट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.








