जळकोट (प्रतिनिधी) – वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे जळकोट तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद होत असून, वाघमारे ताडा व शिवाजी ताडा येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या तांड्यांतील पाणीटंचाईचा प्रस्ताव पंचायत समितीमार्फत तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता.
पंचायत समितीच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही तांड्यांना दररोज एक टँकर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या तालुक्यात उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने पाण्याची गरज अधिक भासत असून, प्रशासनाने ही उपाययोजना सुरू केली आहे. मात्र, दीर्घकालीन उपाययोजनांची गरज असल्याची मागणी स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.









