परतूर (जि. जालना) : शहरातील जईद गल्ली परिसरात घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत पंडितराव हरिभाऊ जईद व त्यांचा मुलगा कृष्णा पंडितराव जईद यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आग लागल्यावेळी घरात उपस्थित असलेल्या दोघांचा बचाव होऊ शकला नाही. सुदैवाने पंडितराव जईद यांच्या पत्नी पार्वतीबाई जईद या त्यावेळी बाहेर गेल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी आरडीसी हदगल तसेच उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत, पीडित कुटुंबाला शासनाकडून तातडीने मदत मिळावी यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.
तसेच, घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाकडून मदत प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली वेगाने सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. संबंधित यंत्रणांकडून घटनेचा सविस्तर तपास सुरू असून, नुकसानाचे पंचनामे व मदतीचे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे









