किनवट — नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील दिव्यांग कर्मचारी नरसिंग गंगाराम रामणवाड यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने किनवट नगर परिषद कर्मचाऱ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. माहितीप्रमाणे, रामणवाड हे सुभाष नगर येथील पाण्याच्या टाकीवर कर्तव्य बजावत असताना नगरसेवक अभय नगराळे यांनी “पाणी का सोडले नाही?” या कारणावरून त्यांच्याशी वाद घालत अपमानास्पद भाषा वापरून शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ नगर परिषद कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले असून, त्याचा परिणाम शहरातील अत्यावश्यक सेवांवर होऊ लागला आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, अग्निशमन सेवा तसेच वीज देखभाल या सेवांवर गंभीर परिणाम होत असून, पुढील काळात नागरिकांना अधिक गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. संपादरम्यान जनतेला होणाऱ्या अडचणींसाठी कर्मचारी जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, सोमवारपासून राज्यभरातील कर्मचारी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. या आंदोलनात नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किरण कालगोटूवार यांच्यासह सुमारे ७५ कर्मचारी सहभागी झाले असून, संबंधित प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.







