सेलू | प्रतिनिधी
ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी वर्धा पोलिसांच्या पुढाकारातून ‘संवाद’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दि. २३ एप्रिल रोजी कान्हापूर येथे विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर तसेच देवेंद्र ठाकूर (पोलीस निरीक्षक, सेलू) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महसूल, शिक्षण, कृषी, वन, आरोग्य आणि महावितरण विभागाचे अधिकारीही उपस्थित असल्याने नागरिकांना विविध विभागांशी संबंधित तक्रारी एकाच ठिकाणी मांडता आल्या.
कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांनी पोलीस व इतर शासकीय विभागांशी संबंधित विविध अडचणी मांडल्या. पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. पोलीस विभागाशी निगडित तक्रारींवर जागेवरच कार्यवाही करण्यात आली, तर इतर विभागांच्या प्रश्नांवर समन्वयातून तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
मार्गदर्शन करताना त्यांनी नागरिकांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले. वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून सतर्क राहणे, तसेच सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याबाबत त्यांनी विशेष सूचना दिल्या. “पोलीस व नागरिक यांच्यातील परस्पर सहकार्य वाढल्यास गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल,” असे त्यांनी नमूद केले.
या संवाद कार्यक्रमाला गावातील पोलीस पाटील, ग्रामस्थ आणि सेलू पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांमध्ये प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले.










