दरेगाव (प्रतिनिधी)
दरेगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘महा जल योजना’ अंतर्गत सुमारे अडीच कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असले, तरीही ते अत्यंत कासवगतीने सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गावकऱ्यांच्या मते, ही योजना राबवण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे गावाला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा असला, तरी प्रत्यक्षात आजतागायत या योजनेचा कोणताही ठोस फायदा नागरिकांना झालेला नाही. पाण्याच्या समस्येमुळे ग्रामस्थांना अजूनही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. गावातील अनेक ठिकाणी पाईपलाइनचे काम अधुरे असून काही भागात काम सुरूच झालेले नाही. त्यामुळे संपूर्ण योजना रखडलेली आहे.
या संदर्भात ठेकेदाराला विचारणा केली असता, “उर्वरित कामाचे बिल अद्याप मिळालेले नाही. बिल मिळाल्यानंतरच पुढील कामाला गती दिली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन महा जल योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. ही योजना पूर्णत्वास गेल्यास गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येतून मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.









