महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात आलेली २१ वी पशुगणना फेब्रुवारी २०२५ मध्ये यशस्वीरित्या पार पडली. फेब्रुवारी ते मे अखेरपर्यंत ही गणना पूर्ण करण्यात आली होती. या कामासाठी विभागाकडून प्रगणक आणि सुपरवायझर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या पशुगणनेदरम्यान प्रगणकांना शहरी भागातील प्रत्येक कुटुंबामागे ९ रुपये तर ग्रामीण भागात १० रुपये मानधन देण्याचे तसेच ऑनलाईन माहिती भरण्यासाठी अतिरिक्त मोबदला देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, एक वर्ष उलटूनही प्रगणकांना केवळ मोबाईल खर्चाचे बिल मिळाले असून मूळ मानधन अद्यापही मिळालेले नाही.
प्रगणकांनी याबाबत तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, “मानधन केंद्र शासनाकडून येते, ते कधी मिळेल याबाबत निश्चित माहिती नाही,” असे उत्तर दिले जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राज्यभरातील प्रगणकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या धोरणामुळे भविष्यात पशुगणना करण्यासाठी प्रगणक मिळणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अनेक प्रगणकांनी सुरुवातीला काम करण्यास अनिच्छा दर्शवली होती, मात्र स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे त्यांनी काम स्वीकारले. आता मात्र मानधन रखडल्याने त्यांच्यात निराशा पसरली आहे.
पुढील काळात अशीच परिस्थिती राहिल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांनाच उपचार व लसीकरणाची कामे थांबवून पशुगणनेचे काम करावे लागेल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, प्रगणकांनी शासनाने तात्काळ दखल घेऊन रखडलेले मानधन वितरित करावे, अशी मागणी केली आहे.









