मारेगाव (प्रतिनिधी)
मारेगाव तालुक्यातील कुंभा गावात नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराचा फज्जा उडाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे शिबिर केवळ औपचारिकतेपुरते मर्यादित राहिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्याचा उद्देश असतानाही, तालुका प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून आले. गर्भवती महिला, शेतकरी, मजूर वर्ग, दिव्यांग, गरीब कुटुंब तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कोणत्याही योजनांचा लाभ या शिबिरात प्रत्यक्षात देण्यात आला नाही.
याहूनही गंभीर बाब म्हणजे वन विभाग, एसटी महामंडळ, बांधकाम विभाग, पंचायत समिती तसेच ग्रामसेवक यांसारखे महत्त्वाचे विभाग अनुपस्थित राहिल्याने संबंधित एकही काम मार्गी लागले नाही. शालेय विद्यार्थ्यांची कागदपत्रे, सातबारा उतारे तसेच इतर प्रशासकीय कामे प्रलंबितच राहिली.
शिबिर घेऊनही नागरिकांच्या समस्या न सुटल्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.










