आजरा शाखेचे अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते धडाक्यात उद्घाटन
अल्पावधीत १५ कोटी ठेवींचा टप्पा पार; आदमापूर येथेही लवकरच सेवा केंद्र
आजरा (प्रतिनिधी) :
सहकार क्षेत्रात पारदर्शक कारभारामुळे अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या कागल तालुक्यातील मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या नव्या शाखेचे उद्घाटन आजरा येथे उत्साहात पार पडले. अण्णाभाऊ संस्था समूहाचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते या शाखेचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक हाजी बाळासाहेब मकानदार होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक निजामभाई लाडजी आणि आजऱ्याचे सहाय्यक निबंधक सुजय येजरे उपस्थित होते.
संस्थेची दैदिप्यमान वाटचाल :
दीड वर्षांपूर्वी जावेदभाई मकानदार यांनी मुरगूड येथे या पतसंस्थेची स्थापना केली. अल्पावधीतच संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन करत ३१ मार्च २०२६ अखेर १५ कोटी २४ लाख रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला आहे. यासोबतच ११ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज वाटप आणि ५ कोटी २४ लाख रुपयांचे सोनेतारण कर्ज वितरित करण्यात आले आहे.
विस्तार आणि आगामी योजना :
सभासदांच्या सोयीसाठी २० ऑगस्ट २०२५ रोजी लिंगनूर (ता. कागल) येथे पहिले सेवा केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यानंतर १ मे २०२६ रोजी आजरा शाखेच्या रूपाने संस्थेने दुसरे पाऊल टाकले आहे. लवकरच भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथे नवीन सेवा केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती संस्थापक चेअरमन जावेदभाई मकानदार यांनी दिली.
मान्यवरांची उपस्थिती :
या सोहळ्यास संभाजी पाटील (उपजिल्हाप्रमुख, शिवसेना उबाठा), दशरथ अमृते (माजी संचालक, आजरा साखर कारखाना), हाजी रशीद पठाण, तसेच उद्योजक निसारभाई लाडजी, समीर गुंजाटी, जुबेरभाई चांद, हाजी मुनाफ खेडेकर, मजीद मुराद, नविज खेडेकर, असिफ सोनेखान, सिकंदर दरवाजकर, एम. डी. महंमद लाडजी, नौशादभाई बुडडेखान, समीर चांद, आरिफभाई खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन शाखाधिकारी मोहसीन मुराद व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. आजरा परिसरात या नव्या शाखेमुळे आर्थिक व्यवहारांना चालना मिळणार असून नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.










