सावंगी मेघे येथे बुद्ध जयंतीनिमित्त प्रबोधन मेळावा उत्साहात
वर्धा, दि. — छत्रपती शिवाजी महाराज मित्र परिवार, सावंगी मेघे (वर्धा) यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त खीरदान वाटप व प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रेमदास मोखाडे व वर्षाताई मोखाडे यांनी केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात गौतम बुद्ध तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदनेने करण्यात आली. यावेळी मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधनकार पत्रकार कांबळे यांनी आपल्या प्रबोधनातून बुद्ध जयंतीचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “बुद्धांचे धम्म तत्त्वज्ञान हे जगात शांतता निर्माण करणारे असून आज देशाला युद्धाची नव्हे, तर बुद्धाची गरज आहे.” त्यांनी पुढे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या मूल्यांना भारतीय संविधानात स्थान देऊन बुद्धांच्या विचारांना संवैधानिक अधिष्ठान दिले, असेही त्यांनी नमूद केले. बुद्ध, फुले आणि आंबेडकर हे परिवर्तनवादी, समतावादी आणि विज्ञाननिष्ठ विचारसरणीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात बुद्ध-भीम गीतांचे सादरीकरण करण्यात आले. “सारे भारत की शान…” या गीताने वातावरण भारावून गेले. शेवटी उपस्थितांना खीरदानाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश इखार, रमेश साटोणे, आनंद सोनटक्के, प्रेमसिंग राठोड, विकेश वानखेडे, सुनील शास्त्रकार, प्रफुल देशमुख, अजय जवादे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.








