सेलू प्रतिनिधी –
शहरातील मेडिकल चौक ते धोऱाड रस्त्यावर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत करण्यात आलेले खोदकाम नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे चित्र समोर आले आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला मोठी नाली खोदण्यात आली होती. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही रस्ता पूर्ववत करण्याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने हा मार्ग अक्षरशः ‘अपघाताचा सापळा’ ठरत आहे.
दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर खोदलेल्या नालीत दुचाकींचे टायर अडकून अनेक अपघात घडले आहेत. काही नागरिक किरकोळ जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापती झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. विशेषतः रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक धोकादायक बनत असून मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.
रस्ता आधीच अरुंद असल्याने खोदकामामुळे वाहतुकीची कोंडी वाढली आहे. समोरासमोर वाहने आल्यास चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे नागरिकांचा संताप वाढत असून, “काम सुरू करताना मोठमोठे दावे केले, पण आता नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.
दरम्यान, नगरपंचायत प्रशासनाकडे विचारणा केली असता, “कंत्राटदाराकडे मजूर कमी असल्याने काम रखडले आहे,” असे कारण देण्यात आले. मात्र नागरिकांनी या कारणावर नाराजी व्यक्त करत, “मजूर कमी झाले म्हणून नागरिकांनी जीव धोक्यात घालायचा का?” असा सवाल उपस्थित केला आहे.
चार महिन्यांपासून उघडी पडलेली नाली, वाढते अपघात आणि वाहतुकीची कोंडी यामुळे नागरिकांनी तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.









