श्रीगोंदा (प्रतिनिधी)
नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी 2029 च्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, “2029 मध्ये जर जुने प्रतिस्पर्धी उमेदवार मैदानात असतील, तर मी पुन्हा खासदारकीची निवडणूक लढवणार आहे.”
सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेबाबत, “मी लोकसभा न लढवता पारनेर विधानसभेची निवडणूक लढवणार,” या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “राजकारणात अशा प्रकारची विधाने ही पुढील राजकीय हालचाली ओळखण्यासाठी केली जातात. याचा अर्थ मी निवडणुकीतून पळ काढतो, असा अजिबात नाही.”
साकळाई योजनेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ही योजना होणे आवश्यक आहे; मात्र कोणत्याही शेतकऱ्यांच्या वाट्याचे पाणी कमी करून त्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊनच योजना राबवली पाहिजे.
तसेच तहसील कार्यालय व पाटबंधारे विभागाशी संबंधित काही प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा करून ते लवकर मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, हरिदास शिर्के, संजय लकुडझोडे आदी उपस्थित होते.


